रत्नागिरी शहराला पाणी पुरविणाऱ्या शीळ धरणाच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ
रत्नागिरी, 25 जून (हिं.स.) । रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणीपातळी ११२.६० मीटरपर्यंत वाढली असून, एकूण उपयुक्त पाणीसाठा ०.९४० द
रत्नागिरी शहराला पाणी पुरविणाऱ्या शीळ धरणाच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ


रत्नागिरी, 25 जून (हिं.स.) । रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणीपातळी ११२.६० मीटरपर्यंत वाढली असून, एकूण उपयुक्त पाणीसाठा ०.९४० दशलक्ष घनमीटर (दलघमी) वर पोहोचला आहे.

आठवड्यापूर्वी धरणातील साठा चिंताजनक पातळीवर गेल्यामुळे रत्नागिरी शहरावर तीव्र पाणीकपातीचे संकट आता टळण्याची चिन्हे आहेत.

यंदा उन्हाळा लांबल्याने आणि जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने दडी मारल्यामुळे शीळ धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावला होता. अवघ्या आठवड्यापूर्वी धरणातील साठा अवघा ०.४५३ दशलक्ष घनमीटर इतका खाली आला होता. धरणाची एकूण साठवण क्षमता ३.३३६ दशलक्ष घनमीटर असून, साठा अत्यंत मर्यादित झाहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र पाणीकपातीची भीती निर्माण झाली होती. प्रशासनालाही पाणी पुरवून वापरण्याचे नियोजन करावे लागत होते.

पावसाळा लांबल्यामुळे रत्नागिरी पालिकेच्या पाणी विभागाने महिनाभरापूर्वी धरणातील साठा टिकवून ठेवण्यासाठी दर सोमवारचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येऊ लागला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात तर परिस्थिती अशी झाली होती की, शहराला एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आले होते. मात्र त्याच आठवड्यात पाऊस पडला आणि ते संकट तात्पुरते टळले होते.

रत्नागिरी शहराला पाणीकपातीचा मोठा धोका निर्माण झालेला असतानाच, सोमवार रात्रीपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने मुसळधार सुरू केली. मंगळवारी दिवसभर पावसाने सातत्य राखल्यामुळे शीळ धरणात पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात वाढला. दोन दिवसांतच साठा ०.९४० दलघमीवर पोहोचल्याने प्रशासनावरील ताण हलका झाला आहे. पावसाचे हे सातत्य पाहता, पालिकेने आता दर सोमवारी बंद ठेवण्यात येणारा पाणीपुरवठा पुन्हा नियमित सुरू ठेवण्याबाबत नवीन नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande