
परभणी, 25 जून (हिं.स.)। स्वातंत्र्यसैनिक दिगंबरराव चौधरी भारस्वाडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाथरी येथे गुरुवार (दि. २५) रोजी शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य सुनील वाकोडकर होते, तर प्रमुख वक्ते म्हणून प्रसाद जोशी यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर प्रा. गजानन अंबेकर, श्रीमती एम. सी. पट्टेकर, जी. व्ही. कुलकर्णी, श्रीमती खरात, उफाडे आणि शेख सोहेल यांची उपस्थिती होती.
'छत्रपतींचा शिवराज्याभिषेक' या विषयावर मार्गदर्शन करताना प्रसाद जोशी म्हणाले, स्वबोधाची जाणीव असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि अथक संघर्षातून ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. प्रशासन, आरमार, गुप्तहेर व्यवस्था आणि न्यायदान या क्षेत्रांत त्यांनी दूरदृष्टीने सक्षम व्यवस्था उभी केली. आजच्या काळातही छत्रपती शिवरायांच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक असून स्वबोध, नागरिकांचे कर्तव्य, समरसता, कुटुंब प्रबोधन आणि पर्यावरण या पाच सूत्रांवर आचरण केल्यास प्रत्येक नागरिक स्वराज्याचा खरा पाईक बनू शकतो, असे त्यांनी प्रतिपादन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis