
मनमाड, 26 जून (हिं.स.)।कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सत्ताधारी गटाकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य आणि बेकायदेशीर निर्णय घेतले जात असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते व बाजार समितीचे माजी सभापती दिपक चंद्रकांत गोगड यांनी केला आहे. बाजार समिती तोट्यात असतानाही सुरू असलेल्या या आर्थिक घोटाळ्यांमुळे समितीचे कधीही भरून न निघणारे नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या सर्व प्रकरणाची वरिष्ठ कार्यालयाकडून सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी, यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून आता या संपूर्ण कारभाराची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती गोगड यांनी दिली आहे.
माजी सभापती दिपक गोगड यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की या बेकायदेशीर कामांविरोधात पणन संचालक, पुणे यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत पणन संचालकांनी बाजार समितीची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.सुरुवातीला या चौकशी आदेशात बाजार समितीतील केवळ एकाच विषयाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, चौकशी दरम्यान बाजार समितीकडून उपलब्ध झालेल्या कागदपत्रांवरून इतरही अनेक वेगवेगळ्या विषयांवर सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे समोर आले. त्यानुसार दिपक गोगड यांनी पुराव्यांसह जिल्हा उपनिबंधक, नाशिक यांच्याकडे पाठपुरावा केला. जिल्हा उपनिबंधकांनी ही बाब गांभीर्याने घेत अतिरिक्त मुद्दे समाविष्ट करून बाजार समितीची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. बाजार समितीचे अस्तित्व टिकवण्यासाठी ही चौकशी वेळेत पूर्ण होऊन त्याचा अहवाल तात्काळ वरिष्ठ कार्यालयास पाठवला जावा, यासाठी आपला सदैव पाठपुरावा राहील, असा निर्धार गोगड यांनी व्यक्त केला आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV