
लातूर, 27 जून (हिं.स.) : महाराष्ट्रातील स्वाभिमानी मजूर संघटनेच्या माध्यमातून मजुरांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जात असून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जात आहे.
संघटनेचे कार्यकर्ते जीवन राठोड, चंदनभाऊ, अभय, आम्रपाली तिगोटे, लक्ष्मी राजपूत, पंचशिला बनसोडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सातत्याने मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
गेल्या एक वर्षापासून राज्यभर कार्यरत असलेल्या या संघटनेच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना काम मिळवून देणे तसेच त्यांच्या समस्या सोडविण्याचे कार्य केले जात आहे. आतापर्यंत सुमारे 40 हजारांहून अधिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
गावपातळीपासून ते तालुका आणि ग्रामपंचायत स्तरापर्यंत निवेदन, अर्ज आणि तक्रारींचा पाठपुरावा करून मजुरांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जात असल्याचेही सांगण्यात आले.
रोजगार हमी योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या कामांची माहिती देऊन पात्र मजुरांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी जनजागृती मोहीमही राबवली जात आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाल्यास अधिकाधिक मजुरांना रोजगार मिळू शकेल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील बेरोजगार आणि गरजू मजुरांना दिलासा मिळत असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणात संघटना महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis