
लातूर, 27 जून (हिं.स.)। चाकूर तालुक्यातील बनसावरगाव येथील रहिवासी बळीराम पांडुरंग टमके यांचा १२ सप्टेंबर २०२५ रोजी विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शोकाकुल असलेल्या टमके कुटुंबीयांना राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी भेट देऊन सांत्वन केले होते. यावेळी त्यांनी या कुटुंबाला महावितरणकडून शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. आपले आश्वासन पूर्ण करत पाटील यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून या कुटुंबाला ४ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली.
दि. २७ जून २०२६ सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते बळीराम टमके यांच्या कुटुंबीयांना या मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या संकटकाळात शासनाने आणि सहकार मंत्र्यांनी दिलेल्या या मदतीमुळे टमके कुटुंबीयांना काहीसा आधार मिळाला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते गणपतराव कवठे यांच्यासह परिसरातील विविध मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis