
नांदेड, 27 जून (हिं.स.)।
राज्य तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी (लॅटरल एंट्री) प्रवेश प्रक्रियेस सुरवात झाली आहे. बारावी विज्ञान, एमसीव्हीसी किंवा समकक्ष उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध आहे. विशेषतः ज्यांना बारावीमध्ये आवश्यक विषय गट (ग्रुपिंग) नसल्याने किंवा सीईटी परीक्षा हुकल्याने अभियांत्रिकीत प्रवेश मिळू शकला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. तीन वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर थेट पदवी अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात प्रवेश मिळू शकतो. अर्ज नोंदणीची मुदत सहा जुलै असून विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करावा. यासाठी ग्रामीण टेक्निकल अॅण्ड मॅनेजमेंट कॅम्पस, विष्णुपुरी येथे शासनमान्य सुविधा केंद्र आहे. येथे अर्ज नोंदणी, कागदपत्र पडताळणी, पर्याय भरताना मार्गदर्शन तसेच प्रवेशप्रक्रियेसंबंधी सर्व मदत उपलब्ध करून दिली जात आहे. संकुल संचालक डॉ. विजय पवार यांनी विद्यार्थ्यांनी अधिकृत सुविधा केंद्राची मदत घ्यावी, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी सुविधा केंद्रप्रमुख प्रा. संदीप वडगावे यांच्याशी संपर्क साधावा. अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis