
पुणे, 04 जून (हिं.स.)।
दहावी आणि बारावीच्या परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित तसेच पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुढील वर्षापासून बोर्डाच्या प्रश्नपत्रिका ऑनलाइन पद्धतीने परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक डिजिटल सुविधा मंडळाकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यात राज्य मंडळाच्या मुख्य कार्यालयात झालेल्या संयुक्त सहविचार सभेत हा निर्णय घेण्यात आला.बैठकीस राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी, सचिव डॉ. दीपक माळी, महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे उपस्थित होते. या नव्या व्यवस्थेनुसार परीक्षा सुरू होण्याच्या काही वेळ आधी प्रश्नपत्रिका ई-मेलद्वारे परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात येतील.नवीन प्रणालीअंतर्गत परीक्षा सुरू होण्याच्या काही वेळ आधी प्रश्नपत्रिका ई-मेलद्वारे संबंधित परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात येतील. त्यानंतर केंद्रांवरच प्रश्नपत्रिकांच्या आवश्यक प्रती छापून विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार त्यांचे वितरण केले जाईल.या व्यवस्थेसाठी परीक्षा केंद्रांवर संगणक, प्रिंटर, सॉफ्टवेअर, वायफाय सुविधा आणि अन्य आवश्यक डिजिटल पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य मंडळाने स्वीकारली आहे.या नव्या उपक्रमामुळे प्रश्नपत्रिका वाहतूक, साठवणूक आणि सुरक्षेशी संबंधित अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच प्रश्नपत्रिका गळती रोखणे, परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित करणे आणि कागदाचा वापर नियंत्रित ठेवणे यासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरेल, असा विश्वास शिक्षण मंडळाने व्यक्त केला आहे.राज्यातील लाखो विद्यार्थी आणि हजारो परीक्षा केंद्रांसाठी ही डिजिटल परीक्षा व्यवस्था महत्त्वाचा बदल ठरणार असून तिच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक तयारी लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु