
लातूर, 04 जून (हिं.स.)।
देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना गंभीर आजारांच्या महागड्या उपचारांपासून वाचवण्यासाठी केंद्र सरकारची ‘आयुष्मान भारत योजना’ मोठे सुरक्षा कवच ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी तब्बल ₹५ लाखांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा दिली जाते.
महत्त्वाची बाब म्हणजे, आयुष्मान कार्डधारकांना अनेक खासगी रुग्णालयांमध्येही मोफत उपचार मिळू शकतात. मात्र त्यासाठी संबंधित रुग्णालय हे आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत पॅनेलमध्ये समाविष्ट असणे आवश्यक आहे.
खासगी रुग्णालय आयुष्मान योजनेत आहे का हे तपासण्यासाठी नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
pmjay.gov.in
तेथे ‘Find Hospital’ या पर्यायावर क्लिक करून राज्य, जिल्हा आणि आजाराची माहिती भरल्यास संबंधित रुग्णालयांची यादी पाहता येते.
कधी मिळते मोफत सुविधा?
रुग्णालयात भरती झाल्यानंतरच या योजनेचा लाभ लागू होतो. यामध्ये ऑपरेशनचा खर्च, औषधे, डॉक्टरांची फी, ICU शुल्क, रक्त तपासणी, एक्स-रे आणि इतर चाचण्या मोफत दिल्या जातात. कॅन्सर, हृदयविकार, किडनी आजार, गुडघा प्रत्यारोपण यांसह 1500 पेक्षा अधिक आजारांवर उपचार कव्हर केले जातात.
हे लक्षात ठेवा :
फक्त OPD तपासणी किंवा डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी आयुष्मान कार्ड लागू होत नाही. तसेच योजनेशी संलग्न नसलेल्या खासगी रुग्णालयात कार्डचा लाभ मिळत नाही.
रुग्णालयाने उपचार नाकारल्यास काय कराल?
जर कोणतेही खासगी रुग्णालय आयुष्मान कार्ड स्वीकारण्यास नकार देत असेल किंवा पैशांची मागणी करत असेल तर त्वरित तक्रार नोंदवावी.
राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक 14555 किंवा 104 वर संपर्क साधता येतो. तसेच रुग्णालयातील ‘आयुष्मान मित्र’ यांच्याकडेही मदत मागता येते. तक्रारीनंतर संबंधित प्रकरणाची चौकशी केली जाते.
७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही लाभ
पूर्वी ही योजना SECC 2011 नुसार गरीब कुटुंबांसाठी मर्यादित होती. मात्र आता ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांनाही या योजनेचा लाभ दिला जात आहे.
पात्रता तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइटवरील “Am I Eligible” पर्याय निवडून मोबाईल नंबर आणि रेशन कार्ड नंबर टाकून पडताळणी करता येते. काही मिनिटांत पात्रतेची माहिती मिळते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis