
सोलापूर, 08 जून (हिं.स.)। नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ (नाफेड) आणि ‘नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ (एनसीसीएफ) यांच्यामार्फत आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट कांदा खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या खरेदीसाठी प्रति क्विंटल १,५८० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.मात्र हा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. खत, बियाणे, मशागत, काढणी आणि वाहतूक खर्च यांचा विचार करता एकरी सुमारे ४० ते ५० हजार रुपये खर्च येतो. अशा परिस्थितीत जाहीर केलेल्या दरातून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.गेल्या तीन वर्षांपासून कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळालेला नाही. त्यातच सन २०२५ च्या खरिप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कांदा पीक कुजले. अद्याप पीक विम्याची रक्कमही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.शेतकरी प्रतिकूल परिस्थितीतही भविष्यात चांगला दर मिळेल या अपेक्षेने कांदा लागवड करतात. मात्र सततच्या तोट्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी होत आहे.दरम्यान, कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये सोमवारपासून (दि. ८ जून) विविध बाजार समित्यांमध्ये थेट खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र नाशिक व लासलगावनंतर मोठी बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ही हमीभाव खरेदी कधी सुरू होणार, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड