

रायगड, 08 जून (हिं.स.)। श्रीवर्धन शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रानवली धरण परिसरात सुरू असलेल्या गाळ उपसा कामाबाबत नागरिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. गाळ काढण्याच्या नावाखाली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नैसर्गिक टेकड्या व उंचवटे तोडून मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या पंधरा दिवसांपासून धरण परिसरात मोठ्या क्षमतेच्या डंपरची सतत वाहतूक सुरू होती. त्यामुळे हजारो टन माती बाहेर नेण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कामासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का तसेच शासनाकडे रॉयल्टी भरली होती का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
धरण परिसरातील नैसर्गिक भूभागात मोठ्या प्रमाणात बदल झाल्यास भविष्यात जलसाठा, पाणीपुरवठा आणि पर्यावरणीय संतुलनावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, स्थानिक नागरिक, पत्रकार आणि सामाजिक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संयुक्त पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, रानवली धरण हे पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असून संबंधित विभागाने निविदा प्रक्रियेद्वारे हे काम दिल्याची माहिती आहे. या संदर्भात श्रीवर्धन नगरपरिषदेचे नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले यांनी गाळ उपसा कामात नियमबाह्य उत्खनन, उंचवटे तोडणे किंवा अन्य कोणताही गैरप्रकार झाला असल्यास संबंधित विभागाने सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)