
रत्नागिरी, 8 जून (हिं.स.) । मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणारे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण येत्या १ जुलैपासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सुरू होत आहे.
या ६ महिन्यांच्या प्रशिक्षण सत्राचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र युवकांनी २९ जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जी. द. सावंत यांनी केले आहे.
प्रशिक्षणाविषयी सविस्तर माहिती अशी :
प्रशिक्षणाचा कालावधी व पात्रता : ६ महिने (१ जुलै ते ३१ डिसेंबर), वयोमर्यादा : १८ ते ३५ वर्षे (सोबत ओळखपत्र व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे आवश्यक). शैक्षणिक पात्रता : किमान चौथी पास (शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडणे आवश्यक), अनुभव: उमेदवार क्रियाशील मच्छिमार असावा व त्याला किमान १ वर्ष मासेमारीचा अनुभव असावा.
विहित नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस असणे बंधनकारक आहे.
प्रशिक्षण शुल्क सर्वसाधारण उमेदवाराला ४५० प्रतिमहिना (६ महिन्यांचे एकूण २,७००),
दारिद्र्यरेषेखालील (BPL) उमेदवाराला १०० प्रतिमहिना (६ महिन्यांचे एकूण ६००) असेल. यासाठी ग्रामसेवक किंवा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
या प्रशिक्षणानंतर उमेदवारांना सागरी नौकांवर पात्रतेनुसार 'खलाशी' म्हणून रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच राष्ट्रीय सहकार विकास निगमअंतर्गत (NCDC) योजनेतून अर्थसाहाय्य घेऊन स्वतःची मच्छिमारी नौका बांधणेही शक्य होणार आहे.
इच्छुक युवकांनी प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्राशी किंवा ९४२२३७१९०१ या मोबाइल व व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधल्यास विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून दिला जाईल. हा अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरून, त्यावर मच्छिमार संस्थेची शिफारस घेऊन २९ जूनपर्यंत कार्यालयीन वेळेत वर नमूद केलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा ईमेलवर सादर करावा.
अधिक माहितीसाठी पेठकिल्ला, रत्नागिरी येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी