
सोलापूर, 09 जून (हिं.स.)। राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील अटी व शर्तींमुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी १२ तारखेपासून पंढरपूर येथे शांततेच्या मार्गाने अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी समाजमाध्यमांद्वारे जाहीर केले. मात्र, या आंदोलनासाठी प्रशासनाकडून अद्याप परवानगी देण्यात आलेली नसल्याचा दावा करत एकतर कर्जमाफीतील जाचक अटी-शर्ती रद्द करा, अन्यथा अन्नत्याग आंदोलनाला परवानगी द्या अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पंढरपूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु त्या ठिकाणीही परवानगी नाकारल्यास, नाईलाजाने नामदेव पायरीजवळ अन्नत्याग आंदोलन सुरू करावे लागेल, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि अन्नदात्याला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड