
नांदेड, 12 जुलै (हिं.स.)। ज्या शेतकऱ्यांच्या बियाण्यांची उगवण झाली नाही, कृषी विभागाने त्याचे तात्काळ पंचनामे करावेत आणि शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. असे निर्देश लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहेत एका बैठकीमध्ये आमदार चिखलीकर यांनी यासंदर्भात आढावा घेतला. या वेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
शिक्षण क्षेत्रात सुधारणा:
कंधार तालुक्यातील १० वी - १२ वीचा कमी लागलेला निकाल आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील घटती पटसंख्या यावर चिंता व्यक्त करत उपाययोजनांचे निर्देश. शाळांना शैक्षणिक साहित्य व संगणक उपलब्ध करून देण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही देण्यात आली.
महाराजस्व अभियान:
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत २५ जुलै रोजी लोहा येथील के-के मंगल कार्यालयात भव्य शिबिराचे आयोजन. सर्व विभागांनी नागरिकांसाठी विविध योजनांचे स्टॉल्स उभारावेत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी विलास नरवाटे यांनी केले आहे.
याप्रसंगी बैठकीला उपविभागीय अधिकारी विलास नरवाटे, लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे, नगराध्यक्ष शरद पवार, सचिन पाटील चिखलीकर यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
लोहा-कंधारचा विकास आणि जनतेचे प्रश्न सोडवणे हीच आमची प्राथमिकता आहे. शिक्षण, कृषी, आरोग्य आणि पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशासन पूर्ण ताकदीने काम करेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis