
रत्नागिरी, 13 जुलै (हिं.स.) । ग्रामीण भागातील विद्यार्थी कष्टाळू असतात. या विद्यार्थ्यांकडे अनेक कला अवगत असतात. त्याचा वापर विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये करावा, असे आवाहन कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांनी केले.
केळ्ये येथील शांताराम यशवंत गोडबोले माध्यमिक विद्यामंदिरात दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात ते बोलत होते. गुणवत्ता महत्त्वाची आहे. भविष्यामध्ये आजच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर स्थान मिळवावे. ज्या ज्या वेळी शाळा अडचणी सांगेल, त्या त्या वेळी आम्ही शाळेला पूर्ण सहकार्य करू, असे आश्वासनही श्री. बापट यांनी दिले.
दहावीच्या परीक्षेत शाळेत प्रथम सिया शेखर मोहिते, द्वितीय ओम विजय सनगरे, तृतीय रुद्र सचिन मांडवकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर रामकृष्ण आनंदवनचे संचालक गिरीश बापट, सरपंच सौ. सौरभी पाचकुडवे, माजी सरपंच गजानन नाखरेकर, उपसरपंच काशिनाथ बापट, विजय केळकर, स्वरूप देसाई, र. ए. सोसायटीचे सहकार्यवाह आणि शालेय समितीचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत दुदगीकर उपस्थित होते.
मुख्याध्यापिका सौ. स्नेहा पाटील यांनी कोकण रेल्वेच्या माध्यमातून शाळेला सौर ऊर्जा सिस्टिम मिळाल्याने शाळेचे वीजबिल शून्य रुपये येऊ लागल्याबद्दल कोकण रेल्वेचे शैलेश बापट यांचे आभार मानले. ऐक्यतेजक मंडळी (ठाणे- मुंबई) यांच्या माध्यमातून प्रयोगशाळेसाठी एक लाख ४० हजारांची देणगी प्राप्त झाली. त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
शालेय समितीचे अध्यक्ष संस्थेचे सहकार्यवाह प्राध्यापक श्रीकांत दुदगीकर यांनी शाळेमध्ये काम करत असलेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांसाठी किती कष्ट करतात याचे मूल्यमापन संस्था नेहमीच करत असते. त्यामध्ये या शाळेचा आलेख निश्चितपणे वर असतो, अशी कौतुकाची थाप सर्व शिक्षकांना दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी