
रायगड, १४ जुलै (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत मतदार यादी दुरुस्ती व पडताळणीचे काम पनवेल तालुक्यात, विशेषतः ग्रामीण भागात, अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे समोर आले आहे. प्रक्रिया सुरू होऊन जवळपास दोन आठवडे उलटूनही अनेक मतदारांच्या घरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) पोहोचले नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन 'एन्यूमरेशन फॉर्म' भरून घेण्याची जबाबदारी बीएलओंवर सोपविण्यात आली आहे. या मोहिमेसाठी शिक्षक, कर निरीक्षक, लिपिक, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र शिक्षकांवर शालेय कामकाजाचा ताण, तसेच अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांच्यावर नियमित जबाबदाऱ्या असल्याने अनेक मतदारांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये ही मोहीम प्रत्यक्षात सुरू आहे की नाही, याबाबतच मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. काही बीएलओंना त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील भागात नियुक्ती देण्यात आल्याने स्थानिक परिसराची माहिती, मतदारांचे पत्ते आणि क्षेत्राचे मॅपिंग पूर्ण झालेले नसल्यामुळे पडताळणीच्या कामाचा वेग आणखी मंदावल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, काही बीएलओ घरपोच पडताळणी करण्याऐवजी मतदारांना कार्यालयात बोलावून फॉर्म भरून घेत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या प्रक्रियेचे पालन होत आहे का, तसेच पडताळणीचे काम निर्धारित मुदतीत आणि अचूकपणे पूर्ण होईल का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
यासंदर्भात उपजिल्हा निवडणूक कार्यालयाने कामात हलगर्जीपणा करणाऱ्या बीएलओंची माहिती मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून मागविली असून आवश्यकतेनुसार संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. पडताळणी प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यास अनेक नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)