
अमरावती, 14 जुलै (हिं.स.) नेरपिंगळाई ग्रामपंचायतच्या वॉर्ड क्रमांक ६ मधील पाणीपुरवठ्याची मुख्य जलवाहिनी गेल्या दोन महिन्यांपासून फुटलेली असून, दररोज मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची नासाडी होत आहे. रस्त्यावर सतत पाणी साचत असल्याने चिखल व अस्वच्छता निर्माण झाली असून नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येबाबत वॉर्डातील नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालयात तक्रारी केल्या असून प्रशासक समितीच्या निदर्शनासही हा प्रश्न वारंवार आणून दिला. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतच्या वारंवार चकरा मारूनही समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे दररोज हजारो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी होत असून काही भागातील पाणीपुरवठ्यावरही त्याचा परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. सार्वजनिक मालमत्तेची होत असलेली हानी थांबवून तातडीने जलवाहिनीची दुरुस्ती करावी, अशी मागणी वॉर्ड क्रमांक ६ मधील नागरिकांनी केली आहे.
--------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी