

रायगड, 15 जुलै (हिं.स.)। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून रायगड जिल्ह्यातील सुमारे ५० हजार महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. ई-केवायसी अपूर्ण राहणे, वयोमर्यादेच्या निकषात न बसणे तसेच अन्य शासकीय योजनांचा लाभ घेत असल्याने या महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महिला व बालविकास विभागामार्फत २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. रायगड जिल्ह्यात सुरुवातीला ६ लाख २५ हजार महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या.
लाभार्थ्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी शासनाने ई-केवायसी आणि कागदपत्र पडताळणी मोहीम राबविली. त्यानुसार जिल्ह्यातील ६३ हजार ७८२ प्रकरणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये अनेक लाभार्थ्यांची ई-केवायसी अपूर्ण किंवा तांत्रिक त्रुटी असल्याचे आढळून आल्याने मार्च महिन्यात २२ हजार ३७५ प्रकरणांची पुनर्पडताळणी करण्यात आली.
तपासणीत काही लाभार्थी नमो शेतकरी, संजय गांधी निराधार यांसारख्या अन्य शासकीय योजनांचा लाभ घेत असल्याचे तसेच काही महिला वयोमर्यादेच्या निकषात बसत नसल्याचे आढळून आले. या सर्व बाबींचा विचार करून सुमारे ५० हजार महिलांना अपात्र घोषित करण्यात आले. महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार, सध्या रायगड जिल्ह्यातील ५ लाख ७६ हजार महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. दरम्यान, पडताळणी प्रक्रियेमुळे लाभार्थी यादीत मोठे बदल झाल्याने या निर्णयाची जिल्हाभर चर्चा सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)