
छत्रपती संभाजीनगर, 15 जुलै (हिं.स.)।
महाराजस्व अभियानातील उपक्रमाची सुरुवात वृक्ष लागवडीने करावी. हरित महाराष्ट्र मोहीम अंतर्गत सर्व शासकीय विभागांना नेमून दिलेल्या वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे . महाराजस्व अभियान उपक्रमाची सुरुवात वृक्ष लागवडीने करून सर्व यंत्रणांनी लोकसहभागातून वृक्षलागवड, जतन आणि संवर्धन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्ष लागवडबाबत बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी वृक्षलागवडी बाबत नेमून दिलेल्या उद्दिष्टांचा आढावा घेतला.
बैठकीस माजी आमदार संजय केणेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीन्नू पी. एम, प्रादेशिक वन अधिकारी सुवर्णा माने, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी संदीप गिरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी,व सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गौडा म्हणाले की, जिल्ह्यात महसूल विभागाच्या वतीने दिनांक २२ जुलै२०२६ रोजी महाराजस्व अभियानाची सुरुवात होणार असून या अभियाना अंतर्गत नागरिकांना विविध सेवा सुविधांचा लाभ देण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात वृक्ष लागवडीने करावी .तसेच जिल्हास्तरीय महाराजस्व अभियानाच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड प्रत्येक मतदारसंघ निहाय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये तसेच प्रत्येक शासकीय विभाग प्रमुख यांच्या उपस्थित हा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा.
सामाजिक वनीकरण विभागाने प्रत्येक शासकीय विभागाला नेमून दिलेल्या वृक्ष लागवडीचे उद्दिष्टाच्या तुलनेत रोपवाटिकांचे संपर्क क्रमांक, नाव, ठिकाण आणि रोपांची उपलब्धता याबाबत नियोजन माहिती करून माहिती उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून त्या- त्या विभागाला नजीकच्या रोपवाटिकेतून रोपांची उपलब्धता होण्यास मदत होईल.
हरित महाराष्ट्र मिशन' ही नागरिकांच्या पुढाकारातून लोक चळवळ व्हावी तसेच यामध्ये विविध सामाजिक संस्थांचा सहभाग घेऊन वृक्षारोपण करण्याचे आवाहन माजी आमदार संजय केनेकर यांनी उपस्थित यंत्रणेला केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis