

रायगड, 15 जुलै (हिं.स.)। मुरुड, : मुरुड ग्रामपंचायतीच्या मालकीच्या आठवडी बाजाराच्या जागेवर कथित अतिक्रमण करून स्मशानभूमीचा विस्तार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून कथित अतिक्रमण हटवावे, अन्यथा सामाजिक सलोखा व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.
१३ जुलै रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात गावात मुस्लिम समाजासाठी आधीपासूनच दोन स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध असून तेथे पुरेशी जागा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. असे असताना ग्रामपंचायतीच्या मालकीच्या आठवडी बाजाराच्या जागेवर स्मशानभूमीच्या नावाखाली संरक्षक कंपाऊंड उभारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जागा अनेक वर्षांपासून आठवडी बाजारासाठी वापरली जात असून या बाजारावर शेतकरी, व्यापारी, भाजी विक्रेते आणि लघुउद्योजकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. बाजाराची जागा कमी झाल्यास स्थानिक व्यापारावर मोठा परिणाम होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून कथित अतिक्रमण तात्काळ हटवावे, सार्वजनिक जागेचे संरक्षण करावे आणि कोणताही सामाजिक तणाव निर्माण होणार नाही यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनाही देण्यात आल्या आहेत.
सामाजिक कार्यकर्ते विनोद कणसे यांनी प्रशासनाने सार्वजनिक जागेवरील सर्व बेकायदेशीर अतिक्रमणे हटवून नागरिकांना न्याय द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. दरम्यान, ही भूमिका ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनातील आरोपांवर आधारित असून संबंधित प्रशासन किंवा इतर पक्षाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)