
लातूर, 15 जुलै (हिं.स.)। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी माजी मंत्री आमदार आ. संजय बनसोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून कार्यकर्ते, सामाजिक संघटना आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे अनुयायी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्यातून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाला आवाज दिला. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी जयंती महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या महोत्सवाचे नियोजन अधिक व्यापक आणि भव्य स्वरूपात करण्यासाठी आ. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वावर समितीने विश्वास व्यक्त केला आहे.
समितीच्या बैठकीत विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन, भव्य मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, समाजप्रबोधनपर व्याख्याने, गुणवंत विद्यार्थी व समाजातील उल्लेखनीय व्यक्तींचा सत्कार तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत चर्चा झाली.
यावेळी आ. संजय बनसोडे यांनी समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानत सांगितले की, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत.
जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने रहावे असे आवाहन त्यांनी केले.
आ. संजय बनसोडे यांच्या अध्यक्षपदी निवडीमुळे यंदाचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव अधिक उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि समाजाभिमुख पद्धतीने पार पडेल, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
सदर बैठक समाजाचे ज्येष्ठ नेते बन्सीलाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली.
यावेळी राजकुमार चव्हाण माजी नगरसेवक, धिरज कसबे नगरसेवक, जवाहरलाल कांबळे नगरसेवक,अजित कांबळे ज्येष्ठ समाजसेवक, रवींद्र बेद्रे समाजसेवक, प्रथमेश देवनाळे, बालाजी रणदिवे, पप्पू गायकवाड, रंजीत कांबळे , राम शिंदे, ऍड. व्यंकट कांबळे आदीसह समाजबांधव उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis