
- धारणी पोलिसांनी पकडला गुटखा; 42 हजाराचा दंड वसूल
अमरावती, 15 जुलै (हिं.स.)
जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा ग्रामीण पोलिसांनी व्यापक पावले उचलली आहेत. या मोहिमेदरम्यान धारणी पोलिस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली असता एका चारचाकी वाहनातून बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या वाहनाला रोखून वाहनासह २ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून प्रतिबंधित गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण २ लाख ७३ हजारांचा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या मोहिमेमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. ही विशेष मोहीम गुप्तता पाळून राबवण्यात आली. ही मोहीम रात्री अकरा वाजल्यापासून ते मंगळवारी पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होती. मध्यरात्रीच्या काळात सर्वत्र नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन करून संशयितांची धरपकड करण्यात आली. या दरम्यान पोलिसांनी १०७१ वाहनांची कसून तपासणी केली असता. त्यापैकी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १८९ वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण ४२ हजार १०० रुपयांचा रोख दंड वसूल करण्यात आला.
यादरम्यान शस्त्र अधिनियमांतर्गत दोन कारवाया करण्यात आल्या. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२ अन्वये १४ कारवाया आणि दारुबंदी कायद्यान्वये एकूण १९ कारवाया करून बेकायदेशीर दारू विक्रेत्यांवर आणि उपद्रवी घटकांवर वचक निर्माण करण्यात आला. या मोहिमेदरम्यान एकूण ५५ पकड वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली. याशिवाय अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या स्टैंडिंग वॉरंटमधील ०६ वॉरंटची देखील अंमलबजावणी करण्यात पोलिसांना यश आले.
अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी ऑपरेशन कवच अंतर्गत मोहीम तीव्र केली आहे. अमरावती ग्रामीण भागात अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू आहे. विशेषतः शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालये यांच्या जवळील १०० मीटर परिसरातील पान टपऱ्यांवर विकल्या जाणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करून शैक्षणिक संस्थांचा परिसर व्यसनमुक्त ठेवण्याचा संकल्प पोलिसांनी केला आहे.
तपासणीसाठी २९६ पोलिस कर्मचारी तैनात ऑपरेशन ऑल-आऊट यशस्वी करण्यासाठी ५२ पोलीस अधिकारी आणि २४४ अंमलदार असे एकूण २९६ पोलीस अधिकारी व अंमलदार रस्त्यावर उतरले होते. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी नाकाबंदी करून संशयित व्यक्ती, वाहने आणि सार्वजनिक ठिकाणांची कसून तपासणी करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी