
रायगड, 17 जुलै, (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था 'अमृत' रायगड जिल्हा कार्यालयाच्या वतीने अलिबाग तालुक्यातील चौल येथील श्री सुंदरनारायण मंदिरात महिलांसाठी 'अमृत रानभाजी पदार्थ स्पर्धा 2026' चे आयोजन करण्यात आले. 'उत्सव रानभाज्यांचा, जागर वसुंधरेचा' या संकल्पनेत झालेल्या या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 13 महिलांनी विविध रानभाज्यांपासून तयार केलेले पौष्टिक व पारंपरिक पदार्थ सादर केले.
स्पर्धेच्या परीक्षिका म्हणून सौ. मेघना आठवले आणि सौ. सुहासिनी शेंडे यांनी काम पाहिले. स्पर्धेत सौ. मानसी जोगळेकर यांनी प्रथम, सौ. स्नेहल विद्वान्स यांनी द्वितीय तर सौ. कांचन जोशी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांसह सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्रके व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून श्री सुंदरनारायण, माता अन्नपूर्णा आणि भारतमाता यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. उपस्थित महिलांनी अन्नपूर्णास्तोत्राचे सामूहिक पठण केले. यावेळी 'अमृत'चे जिल्हा व्यवस्थापक शैलेश मराठे आणि उपव्यवस्थापक मंगेश ढेबे यांनी युवक, महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देत स्वावलंबनाचा संदेश दिला.
यानंतर श्रीपाद गो. केळकर यांनी रानभाज्या आणि भरडधान्यांचे आरोग्यदायी व औषधी महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही त्यांनीच केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. सुषमा आचार्य, महेंद्र साठे, श्रीनिवास गो. केळकर तसेच ग्रामस्थांनी विशेष योगदान दिले. ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)