

रायगड, २० जुलै (हिं.स.) : महाराष्ट्रातील आदर्श जिल्हा परिषद शाळांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पारुनगर (मुरुड) येथील शालेय पोषण आहार योजनेतील कथित आर्थिक अनियमिततेप्रकरणी मुख्याध्यापक हेमंत डी. जोशी यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीणा यांनी निलंबनाचे आदेश जारी केले असून या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
तत्कालीन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तृप्ती अंधारे तसेच शिक्षण विभागाच्या चौकशी अहवालानुसार शालेय पोषण आहार योजनेत ₹८५,०१३ इतकी आर्थिक अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. चौकशीत विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणात पोषण आहार तयार करणे, तांदळाचा अतिरिक्त साठा ठेवणे, शासनाची पूर्वपरवानगी न घेता ६०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक किलोप्रमाणे एकूण ६०० किलो तांदूळ वाटप करणे, तसेच शासनाची दिशाभूल केल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
तक्रारीत पोषण आहारासोबतच डाळी, खाद्यतेल, मसाले, गणवेश वितरणातील कथित गैरव्यवहार, पालकांकडून विकास निधीच्या नावाखाली बेकायदेशीर वसुली आणि शैक्षणिक कामकाजातील त्रुटींचेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
मुख्याध्यापक हेमंत जोशी यांनी सर्व आरोप फेटाळून लावत संबंधित आर्थिक व्यवहार बचत गटामार्फत होत असल्याचा दावा केला होता. मात्र, शाळेच्या शासकीय निधीच्या व्यवस्थापनाची अंतिम जबाबदारी मुख्याध्यापकांचीच असल्याचे स्पष्ट करत प्रशासनाने त्यांचा खुलासा अमान्य केला आणि निलंबनाची कारवाई केली.
या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा ग्रामीण पत्रकार संघ, श्रीकांत टिळक आणि भीम क्रांती संघटनांनी केला होता. शासनाच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आली असून आता या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू होणार आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)