
लातूर, 17 जुलै, (हिं.स.)। चाकूर तालुक्यातील चापोली परिसरातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. एकीकडे पात्र शेतकऱ्यांना अद्याप पिक विम्याचा लाभ मिळालेला नाही,तर दुसरीकडे महाबीज कंपनीच्या ‘सोयाबीन ६१२' वाण बियाण्यांची उगवण न झाल्यामुळे दुबार पेरणीचे मोठे संकट निर्माण झाले आहे.या गंभीर प्रश्नांबाबत चापोलीसह परिसरातील शेतकऱ्यांनी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन पिक विमा व महाबीज कंपनीच्या सोयाबीन बियाणे प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
यावर्षी पात्र शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळालेला नसल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.त्यातच महाबीज कंपनीच्या ‘सोयाबीन ६१२' वाण बियाण्यांची उगवण न झाल्यामुळे दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवलेआहे.परीणामी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या गंभीर प्रकरणी येथील शेतकरी सुरेश शेवाळे,अँड. संग्राम पाटील,मनोज शिंदे,रामेश्वर गादगे,रामकिशन शेळके, राजुकमार काचे,नागेश होनराव, रवीकिरण होनराव,मयूर होनराव, शिवानंद होनराव,यांनी सहकार मंत्र्यांची भेट घेऊन अशी मागणी केली की, पिक विमा शेतकऱ्यांना तातडीने मंजूर करून न्याय द्यावा,महाबीज कंपनीचे निकृष्ट ‘सोयाबीन ६१२’ बियाण्यांमुळे झालेल्या नुकसानीची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई द्यावी, संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी.
यावेळी सहकार मंत्री मा.बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकून संबंधित विभागाशी चर्चा करून,त्यांच्या कडून तातडीने अहवाल मागवून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis