
रायगड, 17 जुलै (हिं.स.)। : कर्जत तालुक्यातील चाहुचीवाडी घाटात भरधाव वेगाने जाणारी ईको कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून कारमधील दोन प्रवासी जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाहुचीवाडी (पो. कळंब, ता. कर्जत) येथील रहिवासी असलेला चालक आपल्या ताब्यातील ईको कार (एमएच 46 बीक्यू 7182) घेऊन कळंब-चाहुचीवाडी मार्गावरील घाटातून जात होता. घाटातील वळणावर भरधाव वेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार विरुद्ध दिशेला जाऊन रस्त्यालगतच्या लोखंडी संरक्षक रेलिंगवर जोरात आदळली.
या अपघातात चालकाला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. तसेच कारमधील दोघा प्रवाशांपैकी एकाला गंभीर व किरकोळ दुखापत झाली असून वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 157/2026 दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) तसेच मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील शेंबडे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)