
लातूर, 17 जुलै (हिं.स.) : डॉ. मेहूल राठोड यांच्या मृत्यू प्रकरणातील शवविच्छेदनाचे अंतिम मत (Reserved Opinion) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राखीव ठेवले आहे. केमिकल ऍनालिसिस (CA) अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा अहवाल येण्यासाठी साधारण तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी मृतदेहातील विविध नमुने केमिकल ऍनालिसिससाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. या अहवालाच्या आधारे मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, याबाबत अंतिम निष्कर्ष काढण्यात येणार आहे.
दरम्यान, तपास यंत्रणांकडून या प्रकरणातील विविध शक्यतांचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात डॉ. राठोड यांच्या हाताला आयव्ही कॅन्युल लावलेले आढळून आले आहे. त्यामुळे त्याद्वारे कोणते इंजेक्शन किंवा औषध देण्यात आले होते का, तसेच त्यांनी स्वतः कोणते औषध घेतले होते का, याचा तपास केला जात आहे.
संबंधित औषध त्यांनी स्वतः घेतले की अन्य कोणीतरी दिले, याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. मात्र, या सर्व बाबींवर अधिकृत निष्कर्ष केवळ केमिकल ऍनालिसिस अहवाल आल्यानंतरच काढला जाणार आहे.
त्यामुळे डॉ. मेहूल राठोड यांच्या गूढ मृत्यूमागील नेमके कारण आणि इंजेक्शन किंवा औषधासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis