
परभणी, 18 जुलै (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. अलीकडील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी मुदतवाढीची केलेली विनंती मान्य करून आयोगाने हा निर्णय घेतल्याची राज्याचे माहिती मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत गृहभेटीची मोहीम ३० जून ते ८ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार असून, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना ८ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर या कालावधीत मतदारांकडून दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. तसेच १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत नोटिसा देणे, सुनावणी घेणे आणि दावे-हरकतींचा निपटारा करण्याची प्रक्रिया पार पडेल. यानंतर १९ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पात्र नागरिकांनी निर्धारित कालावधीत मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी गणना प्रपत्र भरून देऊन निवडणूक प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis