
अमरावती, 18 जुलै, (हिं.स.) - अमरावतीतील श्री हनुमान गढी येथे शनिवारी हजारो हनुमान भक्तांच्या उपस्थितीत भाजपा नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी सामूहिक हनुमान चालीसा पठण केले. राज्यातील शेतकरी सुखी, समृद्ध व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत, वरुणराजाची कृपा होऊन सर्वत्र समाधानकारक पाऊस पडावा आणि शेतीला नवसंजीवनी मिळावी, या उद्देशाने हनुमान चालीसा पठणासह विशेष प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान संपूर्ण परिसर जय श्रीराम आणि जय बजरंगबलीच्या घोषणांनी दुमदुमून गेला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना माजी खासदार नवनीत राणा यांनी नागपूर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर केलेल्या रामरक्षा पठणावर टीका केली. रामरक्षा हा श्रद्धेचा विषय आहे, मात्र उद्धव ठाकरे रामरक्षा नव्हे तर पक्षरक्षा करण्याचे काम करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मला आणि आमदार रवि राणा यांना हनुमान चालीसा पठण करण्यापासून रोखण्यात आले. आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून १४ दिवस कारागृहात ठेवण्यात आले. हनुमान चालीसा म्हणण्यास विरोध केल्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. सत्ता गेली, पक्ष कमकुवत झाला, आमदार, खासदार, नगरसेवक दूर गेले आणि जनतेनेही त्यांना योग्य उत्तर दिले, असा दावा त्यांनी केला.नवनीत राणा यांनी पुढे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करत, आज तेच नागपूरमध्ये मुख्यमंत्री यांच्या घरासमोर रामरक्षा पठण करत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यक्रमाचे स्वागत केले असून, हीच भारतीय संस्कृती आणि भाजपची विचारधारा असल्याचेही त्या म्हणाल्या.
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाचाही त्यांनी उल्लेख केला. राम मंदिराच्या ऐतिहासिक सोहळ्यावेळी देशभरातील रामभक्त अयोध्येत उपस्थित होते. मात्र उद्धव ठाकरे तेव्हा कुठे होते? त्यांनी रामलल्लाचे दर्शनही घेतले नाही. आता मात्र रामरक्षा पठणाचे नाटक करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
यावेळी आमदार रवि राणा यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. नागपूरला गेल्यानंतर त्यांनी प्रथम रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन दर्शन घ्यावे आणि त्यानंतर अमरावतीतील श्री हनुमान गढी येथे येऊन १५१ फूट उंच भव्य हनुमान मूर्तीचे दर्शन घेऊन हनुमान चालीसा पठण करावे. आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करू, असे ते म्हणाले.
रवि राणा यांनी पुढे सांगितले की, आज जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी कोणी हनुमान चालीसा म्हणण्याची इच्छा व्यक्त केली, तर ते त्यांचे स्वागतच करतील. प्रभू श्रीरामांच्या विचारांवर चालणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खऱ्या अर्थाने रामभक्त असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात हजारो भाविकांनी एकत्रितपणे भक्तिभावाने हनुमान चालीसाचे पठण केले. राज्यातील शेतकरी संकटातून बाहेर पडावेत, शेतीला मुबलक पाऊस मिळावा, देशात शांतता, समृद्धी आणि सर्वांच्या जीवनात सुख नांदावे, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
या कार्यक्रमाला श्री निलेशचंद्र मुनी महाराज (मुंबई), उपमहापौर सचिन भेंडे, कमलकिशोर मालाणी, नंदेश अंबाडकर, शैलेंद्र कस्तुरे, प्रकाश साबळे, सोनाली नवले, सुनील काळे, रविराज देशमुख, ललित समदुरकर, राधा कुरील, संजय तिरथकर, कल्याणी तायडे, सुनिता लोणारे, नाना आमले, प्रिती रेवणे यांच्यासह भाजप व युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, महिला पदाधिकारी आणि हजारो हनुमान भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी