
रायगड, 18 जुलै (हिं.स.) : रायगड जिल्ह्यातील ३३५ ग्रामपंचायतींसह राज्यातील तब्बल १५ हजार ३०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ऑक्टोबर महिन्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता असून, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेसाठी १५ एप्रिल २०२६ रोजीची विधानसभा मतदार यादी ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे.
यानुसार, २४ जुलै रोजी ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. २०२४, २०२५ आणि २०२६ मध्ये मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाने महाआयटीने विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून मतदार याद्या तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयांना यासाठी आवश्यक युजर आयडी आणि पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आले असून, तालुकास्तरावर ग्रामपंचायतनिहाय माहिती भरण्याचे काम सुरू आहे.
आयोगाच्या वेळापत्रकानुसार, २४ जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर २९ जुलैपर्यंत मतदार यादीबाबत हरकती आणि सूचना स्वीकारण्यात येतील. प्राप्त हरकतींची छाननी केल्यानंतर ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत हद्दीतील सर्व पात्र मतदारांचा यादीत समावेश झाला आहे का, तसेच हद्दीबाहेरील मतदारांची नावे यादीत समाविष्ट नाहीत ना, याची तपासणी तहसीलदारांकडून केली जाणार आहे.
दरम्यान, काही जिल्ह्यांनी विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निवडणुका घेण्याची मागणी केली होती. मात्र, निवडणुका वेळेत घेण्यासाठी आयोगाने १५ एप्रिल २०२६ ची विधानसभा मतदार यादी आधार मानण्याचा निर्णय घेतला आहे.
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लवकरच ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. पावसाची परिस्थिती लक्षात घेता ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)