
मुंबई, 19 जुलै (हिं.स.)। अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीसाठी उच्च भरतीचा (High Tide) २४ तासांचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याने मच्छीमार आणि किनारपट्टीवरील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
अरबी समुद्रात कमी तीव्रतेचा भूकंपामुळे कोणताही समुद्री धोका निर्माण झालेला नसला, तरी उच्च भरतीच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे टाळावे, किनाऱ्यावर उभ्या असलेल्या नौका, ट्रॉलर आणि मासेमारी साहित्य सुरक्षितपणे बांधून ठेवावे, तसेच किनारपट्टीवरील नागरिक, पर्यटक आणि लहान मुलांनी समुद्रकिनाऱ्यावर किंवा खडकाळ भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय, स्थानिक मत्स्यव्यवसाय विभाग, किनारी प्रशासन आणि अधिकृत हवामान विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
प्राप्त माहितीनुसार, शनिवारी सकाळी अरबी समुद्रात वसई-विरार किनारपट्टीपासून सुमारे ५७ किलोमीटर अंतरावर, ५ किलोमीटर खोलीवर कमी तीव्रतेचा भूकंप नोंदविण्यात आला असला, तरी त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजून ३३ मिनिटांनी रिश्टर स्केलवर ३.२ तीव्रतेचा भूकंप नोंदविण्यात आला. या भूकंपाचे धक्के जमिनीवर कुठेही जाणवले नसून कोणतीही हानी झाल्याची नोंद नाही. तसेच इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस (INCOIS) यांनी त्सुनामीचा कोणताही इशारा किंवा अलर्ट जारी केलेला नसल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने हो स्पष्ट केले आहे.
समुद्रात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास भारतीय तटरक्षक दलाच्या १५५४, किनारी सुरक्षा हेल्पलाईन १०९३ तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या १०७० या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर