
सोलापूर, 19 जुलै (हिं.स.)। आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भरपावसात पंढरपूर येथे दाखल झाले. वारीसाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेत त्यांनी गोपाळपूर येथील दर्शन रांगेत उभ्या असलेल्या वारकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या सुविधा आणि अडचणी जाणून घेतल्या.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पावसाची पर्वा न करता वारी मार्गावरील विविध सुविधा, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सेवा आणि गर्दी नियोजनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रशासनाच्या तयारीची माहिती घेतली तसेच वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
मुख्यमंत्री असताना सुरू केलेली आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा प्रत्यक्ष आढावा घेण्याची परंपरा उपमुख्यमंत्री झाल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी कायम ठेवली आहे. यंदाही त्यांनी प्रत्यक्ष पंढरपुरात येऊन वारी व्यवस्थेचा आढावा घेत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या.
या दौऱ्यादरम्यान मंत्री तानाजी सावंत, मंत्री योगेश कदम, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांसाठी सुरळीत, सुरक्षित आणि सुविधायुक्त व्यवस्था सुनिश्चित करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड