आषाढी वारीत भाविकांना दिलासा; मंदिर समितीकडून अन्नदान, प्रशासनाकडून चोख व्यवस्था
सोलापूर, 19 जुलै (हिं.स.)। आषाढी वारीसाठी पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दर्शन रांगेत मोफत अन्नदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दर्शनासाठी प्रतीक्षेत असलेल्या भाविकांना चहा, पिण्याचे पाणी आणि खिचडी
grdf


सोलापूर, 19 जुलै (हिं.स.)।

आषाढी वारीसाठी पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दर्शन रांगेत मोफत अन्नदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दर्शनासाठी प्रतीक्षेत असलेल्या भाविकांना चहा, पिण्याचे पाणी आणि खिचडी यांचे मोफत वाटप करण्यात येत असून, या उपक्रमाला वारकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आषाढी वारीदरम्यान दरवर्षी 20 ते 25 लाख भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. त्यामुळे दर्शन रांग 10 ते 14 किलोमीटरपर्यंत लांब जाते. यंदा वारकऱ्यांना जलद आणि सुरळीत दर्शन मिळावे यासाठी VIP दर्शन पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

या निर्णयामुळे सर्वसामान्य भाविकांच्या दर्शन प्रक्रियेला गती मिळाली असून, पूर्वीप्रमाणे सात ते आठ तास ताटकळत उभे राहण्याचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर परिसराची पाहणी करून VIP दर्शन बंदीची अंमलबजावणी सुरळीत सुरू असल्याची खात्री केली.

दरम्यान, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे रविवारी सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन होणार असून, स्वागताची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने वारकरी-भाविकांसाठी जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, फिरती शौचालये, पिण्याच्या पाण्याचे टँकर तसेच अन्य मूलभूत सुविधांची व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाने वारी सुरळीत, सुरक्षित आणि भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande