
रत्नागिरी, 20 जुलै (हिं.स.) । जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता २०२६-२७च्या हंगामासाठी आंबा पिकाकरिता फळपीक विम्याचा हप्ता प्रतिहेक्टर १३,६०० रुपयांऐवजी हेक्टरी ८५०० रुपये इतका करण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ही घट झाल्याने शेतकऱ्यांची हेक्टरी ५१०० रुपये बचत होणार असून, विमा संरक्षण कालावधीही १५ मेवरून ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे हंगामाच्या अखेरीला हवामानात होणाऱ्या प्रतिकूल बदलांपासून शेतकऱ्यांना अधिक संरक्षण मिळणार आहे, असेही सामंत यांनी सांगितले. फळपीक विमा योजनेमध्ये प्रथमच नारळ आणि सुपारी या पिकांचाही समावेश करण्यात आला असून, त्यामुळे या पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही विमा संरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे सामंत म्हणाले.
प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर हवामान केंद्र उभारण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असून, त्याद्वारे स्थानिक हवामानाची अचूक माहिती उपलब्ध होऊन फळपीक विमा योजना अधिक परिणामकारक करण्यास मदत होईल, असे श्री. सामंत यांनी सांगितले.जिल्ह्यात सध्या ‘मागेल त्याला काजू कलम’ ही योजना राबवण्यात येत असून, त्याअंतर्गत चार लाख काजू कलमे मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ५० कलमे मोफत दिली जाणार असून, या उपक्रमातून जिल्ह्यात सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रावर नव्याने काजू लागवड होणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.
भात आणि नाचणीसाठी पीक विमा योजनेची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. हवामानबदलामुळे आंबा-काजूच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उत्पादनवाढ प्रकल्प जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून राबवण्यात येणार असून, त्याअंतर्गत जिल्ह्यात २४ क्लस्टर विकसित करण्यात येणार आहेत. त्यात सुमारे ५०० शेतकऱ्यांचा सहभाग असेल. आधुनिक तंत्रज्ञान, हवामान विश्लेषण आणि वैज्ञानिक मार्गदर्शनाच्या साह्याने आंबा-काजू पिकांची उत्पादकता वाढवणं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी