
कोल्हापूर, 20 जुलै (हिं.स.)। जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. तसेच त्यांच्या समस्या सोडवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी दिली. येथील राजर्षी शाहूजी सभागृहात जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांच्या अडी-अडचणी सोडवण्यासंदर्भात जिल्हा सैनिक कल्याण मंडळाची बैठक आज आयोजित करण्यात आली होती .
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले , या ठिकाणी केंद्रीय विद्यालय आणण्यासाठीचा प्रस्ताव तयार करून सब एरियाला प्रशासनाकडून पाठवण्यात येईल. त्याचबरोबर अशासकीय सदस्यांना ओळखपत्र देण्याबाबत जिल्हा प्रशासन आवश्यक त्या बाबींचा अभ्यास करून त्यांना ओळखपत्र देण्याबाबत सकारात्मक राहील. यावेळी निवृत्त लेफ्टनंट कर्नल विलास सुळकुडे यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शासन निर्णयानुसार तालुकास्तरीय समिती गठीत करण्याबाबत मागणी केली त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला . तत्पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉ.भीमसेन चवदार यांनी जिल्ह्यातील माजी सैनिकांचा आढावा घेताना जिल्ह्यात सुमारे 14 हजार 400 माजी सैनिक तर सुमारे 6 हजार 248 दिवंगत माजी सैनिकांच्या पत्नी असल्याची माहिती दिली .या बैठकीसाठी सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे, अशासकीय सदस्य सर्वश्री जितेंद्र खोत, दशरथ पाटील ,संजय माने , दत्तात्रय मोहिते , संजय पाटील आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar