‘स्वच्छ वारी’साठी संकल्प करु या - जिल्हाधिकारी गौडा
छत्रपती संभाजीनगर, 21 जुलै, (हिं.स.)। वाळूज पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या यात्रेच्या पार्श्वभुमिवर स्वच्छता व सुरक्षा उपाययोजनांना प्राधान्य द्यावे व यंदाची वारी ही स्वच्छ वारी करण्य
Q


छत्रपती संभाजीनगर, 21 जुलै, (हिं.स.)। वाळूज पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या यात्रेच्या पार्श्वभुमिवर स्वच्छता व सुरक्षा उपाययोजनांना प्राधान्य द्यावे व यंदाची वारी ही स्वच्छ वारी करण्याचा संकल्प करु या,असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

पंढरपूर येथील यात्रोत्सवाच्या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम.,पोलीस उपआयुक्त पंकज अतुलकर, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी दीपक शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती मस्के, मंदिर प्रशासनाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत, अन्न औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क आदी अधिकारी उपस्थित होते.

यात्रोत्सवाच्या दरम्यान येणाऱ्या भाविकांना फराळाचे वाटप करण्यात येते. त्यासाठी १३ ठिकाणी स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. या प्रत्येक स्टॉल्सवर स्वयंसेवक उपलब्ध असावे. तसेच तयार होणारा कचरा संकलनासाठी कचरा कुंडी उपलब्ध असावी. भाविकांनी इतस्ततः टाकलेला कचरा उचलण्यासाठी स्वच्छता स्वयंसेवक, सफाई कर्मचारी यांना नेमण्यात यावे. घंटागाड्यांची उपलब्धता व कचरा संकलन करणाऱ्या वाहनांची उपलब्धता ठेवावी. या ठिकाणी भाविकांची गर्दी पाहता ४ पाळ्यांमध्ये स्वयंसेवक आवश्यक असतील. ८५५ ठिकाणी स्वयंसेवक लागणार आहेत. त्यामुळे एकूण ३४२० स्वयंसेवकांची आवश्यकता आहे. त्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना आदी विद्यार्थी तसेच स्वयंसेवी नागरिकांनी आपली स्वयंसेवक म्हणून सेवा द्यावी,असे आवाहनही करण्यात आले. तसेच यात्रा परिसरात व मंदिरात मिळून ६५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याद्वारे पोलीस यंत्रणा यात्रेवर लक्ष ठेवणार आहे. शिवाय एआय तंत्राचा वापर करुन यात्रेकरुंची संख्याही मोजण्यात येणार असल्याचे उपायुक्त अतुलकर यांनी सांगितले.

रहदारी, प्रकाश व्यवस्था, वीज पुरवठा, स्वच्छता, अग्निशमन सेवा, अन्न नमुने तपासणी, आरोग्य पथके आदींच्या उपलब्धतेबाबत तसेच आवश्यक पोलीस बळ पुरविण्याबाबत बैठकीत जिल्हाधिकारी गौडा यांनी निर्देश दिले. यंदाची वारी ही स्वच्छ वारी म्हणून व्हावी यासाठी संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande