
सोलापूर, 01 ऑगस्ट (हिं.स.)।
आषाढी एकादशी यात्रेनिमित्त वारकरी भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्था उभारून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वारीच्या कालावधीत विभागाने ४ हजार ६४३ विशेष फेऱ्या चालवत २ लाख २१ हजार ९४८ वारकरी भाविकांची सुरक्षित आणि वेळेत वाहतूक केली.
या कालावधीत एसटीच्या बसांनी एकूण ४ लाख ५१ हजार ९५८ किलोमीटर अंतर पार केले. या विशेष सेवेमुळे सोलापूर विभागाला २ कोटी ६१ लाख ३१ हजार ६४ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रवासी उत्पन्नात २३ लाख ७४ हजार ४९० रुपयांची वाढ झाली असून, ही वाढ प्रभावी नियोजन आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेचे द्योतक असल्याचे एसटी प्रशासनाने म्हटले आहे.
या विशेष मोहिमेत विविध आगारांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, सोलापूर आगाराने सर्वाधिक ४३ लाख ८४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत आघाडी घेतली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड