
बीड, 01 ऑगस्ट (हिं.स.)।
: देवदहिफळचे माजी सरपंच तथा धारूर पंचायत समितीचे माजी उपसभापती नरहरी शहाजी बडे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने देवदहिफळसह संपूर्ण धारूर तालुक्यावर शोककळा पसरली असून विविध स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे.
प्रगतिशील शेतकरी, यशस्वी कुक्कुटपालन व्यावसायिक आणि आदर्श स्वस्त धान्य दुकानदार अशी त्यांची ओळख होती. सरपंच म्हणून कार्यरत असताना त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले. रस्ते, पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा तसेच इतर विकासकामांना गती देत त्यांनी गावाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले.
गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर जावे लागू नये, या उद्देशाने इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग देवदहिफळ येथे सुरू करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शिक्षण, विकास आणि जनसेवा यांचा समतोल साधणारे लोकनेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती.
स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे निष्ठावंत सहकारी म्हणूनही ते परिचित होते. साधेपणा, प्रामाणिकपणा, सर्वसामान्यांशी जिव्हाळ्याचे नाते आणि समाजहिताची तळमळ यामुळे त्यांनी जनमानसात वेगळे स्थान निर्माण केले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, दोन सुना, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने देवदहिफळ गावाने विकासाभिमुख, लोकाभिमुख आणि समाजसेवेसाठी आयुष्य वेचणारे नेतृत्व गमावल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis