रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोफत डायलिसीस सुविधा
रत्नागिरी, 1 ऑगस्ट (हिं.स.) । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात डायलिसिस विभागात जिल्ह्यातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. हजारो रुग्ण महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या विभागातील सुविधेचा लाभ घेत
डायलेसिस विभागातील कर्मचारी


रत्नागिरी, 1 ऑगस्ट (हिं.स.) । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात डायलिसिस विभागात जिल्ह्यातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. हजारो रुग्ण महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या विभागातील सुविधेचा लाभ घेत आहेत.

पूर्वी ज्या रुग्णांना डायलिसिससाठी कोल्हापूर, मुंबई किंवा खासगी रुग्णालयांमध्ये हजारो रुपये खर्च करावे लागत होते, त्यांना आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरीतच मोफत, दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध झाली आहे.

या विभागातील उपचार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.उत्तमराव कांबळे (वैद्यकीय अधिकारी), प्रशिक्षित तंत्रज्ञ, परिचारिका आणि नेफ्रॉलॉजिस्ट (मूत्रपिंड तज्ज्ञ) डॉ. अमेय बेडेकर यांच्या थेट देखरेखीखाली केले जातात.

डायलिसिस सत्रासोबतच रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रक्ताच्या तपासण्या आणि लागणारी महत्त्वाची इंजेक्शनही मोफत दिली जातात.

शासकीय रुग्णालयात २०१३ मध्ये सुरू झालेल्या डायलिसिस विभागामध्ये सद्यःस्थितीत १६ बेड व मशीन कार्यरत असून त्यातील २ बेड व मशीन पॉझिटिव्ह रुग्णांकरिता ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्यासाठी वेगळा आयसोलेशन रूम तयार करण्यात आला आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येणाऱ्या काळात बेड आणि मशीनची संख्या वाढवली जाईल असे, प्रतिपादन डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.

रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्हा रुग्णालयाचा कायापालट झाला असून येथे दरमहा हजारो रुग्ण ओपीडी आणि आयपीडी सेवांचा लाभ घेत आहेत. डायलिसिस विभागामुळे जिल्ह्यातील ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांचा आर्थिक भार संपला असून, त्यांना हक्काची 'संजीवनी' मिळाली आहे.

दर महिना ७० ते ८० रुग्ण नियमित या सुविधेचा लाभ घेतात व महिना ६५०-७०० सायकल होतात.

जून २०२५ ते जून २०२६ या कालावधीमध्ये जिल्हाभरातील १०२४ नियमित रुग्ण व वर्षाला ९०७६ सायकल याद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डायलिसिस विभागात उपचार घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande