
सोलापूर, 01 ऑगस्ट (हिं.स.)। जुलै महिना संपल्यानंतरही सोलापूर जिल्ह्यात पावसाने अपेक्षित हजेरी लावलेली नसल्याने ग्रामीण भागातील पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २८ गावे आणि १४६ वाड्या-वस्त्यांमधील सुमारे ८० हजार नागरिकांना ३१ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जिल्ह्यात माढा आणि सांगोला तालुक्यांमध्ये सर्वाधिक टँकर सुरू असून, त्याखालोखाल करमाळा, माळशिरस, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी आणि अक्कलकोट तालुक्यांतही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १७ विहिरी आणि ६ बोअरवेल अधिग्रहित करूनही पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यातही पाऊस समाधानकारक झाला नाही तर टँकरची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, चांगला पाऊस झाल्यास टँकरवरील अवलंबित्व कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड