
सोलापूर, 02 ऑगस्ट (हिं.स.)।
श्री स्वामी समर्थांच्या पवित्र नगरी अक्कलकोटच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पहिल्या टप्प्यातील ५०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची तयारी करून तो तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या प्रक्रियेला वेग मिळाल्याचे सांगण्यात आले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीला गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी व लोकेश चंद्रा, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना तसेच म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोटचा विकास आराखडा विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून म्हाडाकडे सोपविण्याची मागणी केली होती. त्यानुसार अक्कलकोट नगरपरिषद, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि म्हाडा यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.
बैठकीत श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर, श्री स्वामी समर्थ समाधी मठ परिसर तसेच भाविकांसाठी आवश्यक आधुनिक सुविधा विकसित करण्याचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी पहिल्या टप्प्यातील ५०० कोटी रुपयांच्या विकासकामांचा प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या विकास आराखड्यामुळे अक्कलकोटमध्ये धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच भाविकांसाठी आधुनिक सुविधा, पायाभूत विकास आणि शहराच्या सर्वांगीण उन्नतीला मोठी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड