
पुणे, 02 ऑगस्ट (हिं.स.)।
पुणे शहराच्या भविष्यातील वाढत्या पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन शहरासाठी २५ टीएमसी पाणी कोटा मंजूर करावा, तसेच खडकवासला धरणसाखळीतील गाळ काढून जलसाठा क्षमता वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी महापौर मंजुषा नागपुरे यांनी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली.
मुंबई येथे झालेल्या बैठकीत महापौरांनी धायरी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित दोन पुलांच्या बांधकामास जलसंपदा विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) तातडीने मंजूर करण्याची मागणी केली.
तसेच, मुळा-मुठा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी राज्यस्तरीय मिशन स्थापन करून नदीतील गाळ काढणे, प्रदूषण नियंत्रण आणि पूर व्यवस्थापनासाठी एकात्मिक आराखडा राबविण्याची सूचनाही त्यांनी केली.
याशिवाय खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांतील गाळ काढून जलसाठा क्षमता वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी आणि त्यासाठी संयुक्त उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, अशी मागणीही महापौरांनी यावेळी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु