
रायगड, 20 ऑगस्ट, (हिं.स.)। खोपोली शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. खारघर रेल्वे स्थानक परिसरातील पार्किंग इमारतीच्या धर्तीवर खोपोली शहरातही बहुमजली मोफत पार्किंग इमारत उभारण्यात यावी, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष सतीश बाळू येरुणकर यांनी केली आहे. याबाबत खोपोली नगरपालिकेला निवेदन देण्यात आले. तसेच नगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांच्यासोबत शहरातील वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
खोपोली शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून, त्या तुलनेत पार्किंगची सुविधा अपुरी आहे. त्यामुळे नागरिकांकडून रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जातात. परिणामी प्रमुख रस्ते, बाजारपेठ परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होते. या समस्येमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
खारघर रेल्वे स्थानक परिसरात उपलब्ध असलेल्या पार्किंग सुविधेच्या धर्तीवर खोपोलीतही बहुमजली पार्किंग इमारत उभारल्यास रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत होईल. तसेच नागरिकांना सुरक्षित आणि सोयीस्कर पार्किंगची सुविधा मिळेल, असा विश्वास येरुणकर यांनी व्यक्त केला.
यावेळी सिद्धेश घोडके, अभिजित मोरे, विनित मोडक, महिला अध्यक्षा सोनल चौहान, निहाल गायकवाड आणि नन्या गायकवाड आदी उपस्थित होते. खोपोलीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न गांभीर्याने घेऊन नगरपालिकेने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)