
अमरावती, 20 ऑगस्ट (हिं.स.)। महर्षी शाळेतील अकरावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, मेळघाटातील शाळांमध्ये झालेल्या अन्नविषबाधेच्या घटना आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी आजपासून अमरावतीतील अपर आदिवासी आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
महर्षी शाळेत अकरावीमध्ये शिकणाऱ्या राजेश पेठेकर या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी शाळा प्रशासनाविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच शाळेची कायमस्वरूपी मान्यता रद्द करावी, अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. याशिवाय आदिवासी विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून दिला जाणारा भोजन पुरवठा बंद करून पर्यायी व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असल्याचा आरोप करत ५ ऑगस्टचा शासन निर्णय (जीआर) रद्द करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मेळघाटातील टीटंबा तसेच अन्य चार शाळांमध्ये सेंट्रल किचनच्या अन्नामुळे विद्यार्थी आजारी पडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनांमध्ये अन्नविषबाधा नसून व्हायरल इन्फेक्शनमुळे विद्यार्थी आजारी पडल्याचा दावा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केल्याचा आरोप करत, त्यांच्या राजीनाम्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे.
विविध मागण्यांसाठी सुरू झालेले हे आंदोलन बेमुदत असून, शासनाने तातडीने दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी