
सोलापूर, 20 ऑगस्ट (हिं.स.)।
भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे सोलापुरात आगमन झाले. बालाजी सरोवर येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष संघटना मजबूत करण्यासह आगामी काळातील पक्षाच्या वाटचालीबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आगमनावेळी सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. तसेच आगामी काळातील पक्षाचे उपक्रम, संघटन विस्तार आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भूमिकेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, मंडल अध्यक्ष नागेश खरात, देविदास बनसोडे, दत्तात्रय बडगू, सिद्धार्थ मंजेली यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले असून, बैठकीच्या निमित्ताने सोलापुरातील भाजपच्या संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड