
धाराशिव, 21 ऑगस्ट (हिं.स.)। संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष १०९८च्या वतीने जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याबरोबरच बालहक्क,बालविवाह प्रतिबंध आणि ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ याबाबत माहिती देण्यात आली.
प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ए.बी.कोवे आणि चाईल्ड हेल्पलाईन १०९८चे प्रकल्प समन्वयक व्ही.पी.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला.
धाराशिव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेंबळी, सरस्वती माध्यमिक विद्यालय बेंबळी,प्रभाकर बोंदर विद्यालय बेंबळी,जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कसबे तडवळा,सनराईस इंग्लिश स्कूल येडशी,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येडशी,जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा येडशी,तसेच नगर परिषद शाळा क्रमांक २३ धाराशिव,मराठी कन्या शाळा धाराशिव आणि पद्मसिंह पाटील विद्यामंदिर धाराशिव येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.
उपक्रमादरम्यान बालकांचे हक्क, त्यांच्या समस्या आणि त्यांच्यासमोर निर्माण होणाऱ्या विविध अडचणी याबाबत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात आला.‘बेटी बचाव,बेटी पढाव’ तसेच बालविवाहाच्या दुष्परिणामांबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.संकटात सापडलेल्या किंवा कोणत्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता असलेल्या बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ उपलब्ध असल्याचे सांगून,गरज भासल्यास या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
बालकांसाठी शासनाच्या विविध योजनांचीही यावेळी माहिती देण्यात आली.चाईल्ड हेल्पलाईन कक्षाच्या समुपदेशक वंदना कांबळे,सुपरवायझर अमर भोसले व पल्लवी पाटील तसेच केस वर्कर अभयसिंह काळे यांनी विद्यार्थ्यांना चाईल्ड हेल्पलाईन कक्ष १०९८च्या कार्याबाबत मार्गदर्शन केले.
बालकांनी भीती न बाळगता आपल्या समस्या मांडाव्यात,त्यांचे हक्क आणि सुरक्षिततेबाबत जागरूक राहावे,असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमांना संबंधित शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. बालकांच्या सुरक्षिततेसाठी केवळ मदत उपलब्ध करून देणे नव्हे,तर त्यांना योग्य वेळी बोलते करणे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणे, हा या जनजागृती उपक्रमाचा संदेश ठरला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis