
रायगड, 21 ऑगस्ट, (हिं.स.)। रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोजगार हमी योजना, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आज रायगड किल्ल्यावर भेट देत राजमाता जिजाऊंना अभिवादन केले. रायगडाच्या पवित्र भूमीवर दाखल झाल्यानंतर त्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतींना नमन करून आदर व्यक्त केला.
राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या संस्कारातून स्वराज्याची प्रेरणा आणि विचार पुढे आले. त्यामुळे रायगडासारख्या ऐतिहासिक स्थळी राजमाता जिजाऊंना अभिवादन करणे ही अभिमानाची बाब असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
पालकमंत्री गोगावले यांनी रायगड किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व अधोरेखित करत किल्ले, गड-दुर्ग आणि ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन करण्याची गरज व्यक्त केली. रायगड हा केवळ महाराष्ट्राच्या नव्हे, तर संपूर्ण देशाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण प्रेरणास्थळ असल्याने त्याचे वैभव भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रशासनातील अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी उपस्थित होते. पालकमंत्री गोगावले यांच्या रायगड भेटीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. राजमाता जिजाऊंच्या विचारांना आणि स्वराज्याच्या प्रेरणेला अभिवादन करत पालकमंत्र्यांनी रायगडाच्या ऐतिहासिक वारशाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)