
नंदुरबार, 21 ऑगस्ट (हिं.स.) खरीप हंगाम 2026-27 अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’त सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांना आता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त कर्जदार शेतकरी बांधवांनी आपले विमा अर्ज बँकेमार्फत वेळेत सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.
शासनाच्या 3 जुलै 2026 च्या निर्णयानुसार खरीप हंगाम 2026-27 मध्ये भात, खरीप ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, तूर, मका आणि कापूस ही पिके अधिसूचित करण्यात आलेली आहेत. या योजनेत सहभागी होण्याची मूळ अंतिम मुदत 31 जुलै 2026 पर्यंत होती. मात्र, प्रतिकूल हवामान परिस्थिती आणि मुदतीच्या शेवटी बँकांना येणाऱ्या विविध तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन केंद्र शासनाकडे मुदतवाढीची विनंती करण्यात आली होती. शेतकऱ्यांचे व्यापक हित लक्षात घेऊन केंद्र शासनाने कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही अंतिम मुदत आता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवून दिली आहे. या मुदतवाढीमुळे उर्वरित सर्व कर्जदार शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेणे शक्य होणार असून, जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी विहित मुदतीत अर्ज दाखल करावेत, असे कृषी विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर