
कोल्हापूर, 22 ऑगस्ट, (हिं.स.)। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना युवा पिढीबद्दल आपुलकी आणि चिंता असती तर ते इतकी वर्ष लोकसभेचे सदस्य आहेत, विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी कधीच आवाज उठवलेला दिसून येत नाही. त्यामुळे संधीसाधूपणा काही नेत्यांमधून दिसून येतो, अशी टीका विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. कोल्हापुरात करवीर निवासिनी आई अंबाबाई देवीच्या दर्शनानंतर नार्वेकर माध्यमांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले ''विरोध प्रदर्शन करणं लोकशाहीत प्रत्येकाचा अधिकार आहे, परंतु जो व्यक्ती लोकशाहीवर विश्वास ठेवतो, तो व्यक्ती असंवैधानिकरित्या आपल्या विरोधाचं प्रदर्शन करत नाही. विरोधाच्या नावाखाली हिंसाचार किंवा अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असाल, तर असैवैधानिक कृत्यावरती कारवाई करणं प्रशासनाची जबाबदारी आहे.
नार्वेकर म्हणाले, ''आपल्या संवैधानिक प्रक्रियेमध्ये एखाद्या निर्णयाविरोधात आपलं मत असेल, तर न्यायव्यवस्थेकडं दखल घेण्याची विनंती करू शकतो. जे लोक माझ्या निर्णयाशी सहमत नव्हते, त्यांनी याचिका दाखल केली असेल, किंवा निवडणूक आयोगाच्या निर्णयाशी ते सहमत नसतील, तर याचिका दाखल केली असेल, तर युक्तिवाद करणं त्यांचा अधिकार आहे. युक्तिवाद झाला म्हणजे कोर्टाचा निर्णय झाला, असं नव्हे. त्यांनी त्यांचा युक्तिवाद करतील, युक्तिवाद झाल्यानंतर योग्य त्या फॅक्टची दखल घेऊन सुप्रीम कोर्ट योग्य तो निर्णय देईल, मी जो निर्णय दिला आहे, तो अत्यंत शाश्वत आणि सुप्रीम कोर्टाच्या निकषावर आधारित निर्णय दिला आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालय निर्णय येईपर्यंत, मी यावर बोलणं उचित नाही. मी संवैधानिक पदावर आहे यावर बोलणं अशोभनीय होईल.''
दर्शनानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ॲड. नार्वेकर म्हणाले की, राज्यातील सर्व नागरिकांना सुख, समृद्धी प्राप्त होवो व चांगला पाऊस पडून पर्यावरणाचे संवर्धन होवो, यासाठी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या चरणी प्रार्थना केली.
याप्रसंगी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिव वर्षा साळुंखे- परीट, महादेव दिंडे, गणेश निर्लेकर, समित कदम, विजय जाधव आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar