रत्नागिरी : बाळासाहेब खेर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी कृतज्ञता दिन
रत्नागिरी, 22 ऑगस्ट (हिं.स.) । श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टतर्फे संस्थापक व मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री व थोर मानवतावादी कै. बाळासाहेब खेर यांचा जन्मदिन कृतज्ञता दिन म्हणून रविवारी, दि. २३ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त यावर्षीच
बाळासाहेब खेर


रत्नागिरी, 22 ऑगस्ट (हिं.स.) । श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टतर्फे संस्थापक व मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री व थोर मानवतावादी कै. बाळासाहेब खेर यांचा जन्मदिन कृतज्ञता दिन म्हणून रविवारी, दि. २३ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे.

यानिमित्त यावर्षीचा ‘बाळासाहेब खेर आदर्श छात्र पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. हा समारंभ रविवारी, सायंकाळी ४ वाजता सर्वोदय छात्रालयातील मोरोपंत जोशी सभागृहात होणार आहे.

कै. बाळ गंगाधर खेर स्वातंत्र्यसेनानी, मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, थोर मानवतावादी व पद्मविभूषण सन्मानाचे मानकरी होते. त्यांनी स्थापन केलेल्या सर्वोदय छात्रालयातून आजवर १६०० हून अधिक विद्यार्थी शिकून चांगल्या पदावर पोहोचले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व लातूर परिसरातील ग्रामीण भागातील गरीब, वंचित व धडपडणाऱ्या मुलांचे आश्रयस्थान म्हणून सर्वोदय छात्रालय कार्यरत आहे. चारित्र्यसंपन्न युवक घडविणे आणि स्त्रीशक्ती जागृत करणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

त्याचाच एक भाग म्हणून रविवारी कृतज्ञता दिन साजरा करण्यात येणार असून यावेळी कोमसापचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे प्रमुख पाहुणे असून अध्यक्षस्थानी श्रीमान भागोजी शेठ कीर विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. राजशेखर मलुष्टे उपस्थित राहणार आहेत. तसेच यमुनाबाई खेर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. संदीप ढवळ, मॅनेजिंग ट्रस्टी पांडुरंग पेठे, ट्रस्टी श्रीमती सोनवीताई देसाई व बाळकृष्ण शेलार, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन चाळके, उपाध्यक्ष प्रा. बीना कळंबटे, कार्यवाहक नरेंद्र खानविलकर यांच्यासह श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट आणि सर्वोदय छात्रालयाचे आजी-माजी छात्रमित्र उपस्थित राहणार आहेत.

रत्नागिरीतील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande