
रायगड, 22 ऑगस्ट (हिं.स.)। राज्याच्या राजकारणात महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय असल्याचे चित्र दिसत असले, तरी रायगड जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष कायम असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील राजकीय शाब्दिक संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना, “राष्ट्रवादी हा नेहमीच खोडा घालणारा पक्ष आहे. भाजप आणि आमचे विचार जुळतात,” असे वक्तव्य केले. तसेच तटकरे कुटुंबाला लवकरच राजकीय झटका मिळेल, असा दावा केल्याचे सांगितले जात आहे.
दळवी यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना संयमित भूमिका घेतली. “त्यांनी काय बोलावे, याचे उत्तर द्यायला मी बांधील नाही. मला माझा दर्जा आणि माझी गुणवत्ता माहीत आहे. त्यांनी बोलावे आणि मी काय उत्तर द्यावे, यासाठी मी बांधील नाही,” असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
रायगडच्या राजकारणात तटकरे आणि दळवी यांच्यातील राजकीय संघर्ष यापूर्वीही अनेकदा समोर आला आहे. महायुतीमध्ये दोन्ही पक्ष सत्तेत सहभागी असले, तरी स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांमुळे दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.
आगामी काळात रायगडमधील राजकीय समीकरणे कशी बदलतात आणि दळवी यांच्या विधानाला तटकरे यांच्याकडून पुढे काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)